एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. एकीकडे मुंबई महापालिका निवडणुकांसाठी ठाकरे बंधू एकत्र येण्याचा निर्णय जाहीर करत असतानाच महायुती सरकारने घेतलेले राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील चार महत्त्वाचे निर्णय समोर आले.
खरं तर ठाकरे बंधूंची पत्रकार परिषद आणि राज्य मंत्रिमंडळाची बैठक यांचा परस्पर संबंध नाही, पण थोड्याबहुत फरकाने एकाच वेळी जाहीर झालेल्या या दोन निर्णयांच्या टाइमिंगची चर्चा रंगली होती.
राज्य मंत्रिमंडळाचे कोणते चार निर्णय?
ग्राम, तालुका व जिल्हा प्रशासन सक्षम करण्यासाठी जिल्हा कर्मयोगी २.० आणि सरपंच संवाद कार्यक्रम राबविणार (सामान्य प्रशासन विभाग निर्णय)
महाराष्ट्रातील राज्यातील जिल्हा परिषदांतर्गत आरोग्य विभागामध्ये कार्यरत व सेवानिवृत्त झालेल्या बंधपत्रित आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या नियमित होणार. (ग्रामविकास आणि पंचायत राज विभाग निर्णय)
धाराशिव शहरात साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यासाठी दुग्ध व्यवसाय विकास विभागाची एक एकर जागा. (महसूल विभाग निर्णय)
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये सुधारणा करणार. नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या थेट निवडून आलेल्या अध्यक्षाला सदस्यत्व मिळणार. मताचाही अधिकार मिळणार. अधिनियमातील सुधारणेसाठी अध्यादेश काढला जाणार. (नगर विकास विभाग निर्णय)
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा
दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकांसाठी ठाकरे बंधू यांनी अखेर एकत्र येण्याचा निर्णय जाहीर केला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात बीएमसी निवडणूक साठी युतीची औपचारिक घोषणा करण्यात आली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मुंबईतील वरळी भागातील ब्लू सी हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेत युती जाहीर केली. यावेळी उद्धव आणि राज यांच्यासह संजय राऊतही मंचावर उपस्थित होते. उपस्थितांशी संवाद साधताना, मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि आमचाच होणार, असं राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं. कुठल्याही भांडण किंवा वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, या वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाल्याचं राज ठाकरे यावेळी म्हणाले.






