Home » ताज्या बातम्या » धक्कादायक! महापालिका निवडणुकीनंतर हजारो महिलांचे लाडकी बहीण योजनेचे पैसै थांबले, संतप्त महिलांची कार्यालयामध्ये गर्दी

धक्कादायक! महापालिका निवडणुकीनंतर हजारो महिलांचे लाडकी बहीण योजनेचे पैसै थांबले, संतप्त महिलांची कार्यालयामध्ये गर्दी

Facebook
Twitter
WhatsApp
20 Views

धक्कादायक! महापालिका निवडणुकीनंतर हजारो महिलांचे लाडकी बहीण योजनेचे पैसै थांबले, संतप्त महिलांची कार्यालयामध्ये गर्दी

 

बुलढाणा: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना मानली जाते. मात्र, बुलढाणा जिल्ह्यात या योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे ३० हजार महिलांचा गेल्या दोन महिन्यांपासूनचा 1500 रुपयांचा मासिक हप्ता अचानक थांबल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

योजना कायमस्वरूपी बंद होणार असल्याच्या अफवा पसरल्याने ग्रामीण भागातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, संतप्त महिलांनी जिल्हा महिला व बालकल्याण कार्यालयात गर्दी करत चौकशी सुरू केली आहे.बुलढाणा जिल्ह्यात सध्या साडेसहा लाखांहून अधिक महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत. मात्र, प्रशासकीय पडताळणीदरम्यान ई-केवायसी प्रक्रियेत त्रुटी आढळल्याने सुमारे ३० हजार लाभार्थी महिलांचे हप्ते तात्पुरते रोखण्यात आले आहेत. बँक खाते आधारशी लिंक नसणे, आधार तपशीलात तफावत किंवा तांत्रिक अडचणी ही यामागची प्रमुख कारणे असल्याचे स्पष्ट झाले आहे.योजना बंद झाल्याच्या वावड्या उठल्याने महिलांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला. अनेक महिलांनी “आमचा हक्काचा पैसा नेमका का थांबला?” असा सवाल उपस्थित करत प्रशासनाकडे थेट धाव घेतली.या पार्श्वभूमीवर महिला व बालकल्याण विभागाने खुलासा करत योजना बंद झालेली नसल्याचे स्पष्ट केले आहे. केवळ ज्यांच्या कागदपत्रांमध्ये किंवा ई-केवायसी प्रक्रियेत त्रुटी आहेत, त्यांचाच लाभ तात्पुरता थांबवण्यात आला असून, आवश्यक दुरुस्ती पूर्ण होताच रखडलेले हप्ते मिळणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.दरम्यान, अन्य काही ठिकाणीही पैसे न आल्याने महिलांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्याचे चित्र आहे. महिलांच्या आर्थिक आधाराशी संबंधित योजना असल्याने तांत्रिक अडचणींमुळे लाभार्थ्यांना त्रास होऊ नये, यासाठी प्रशासनाने तातडीने मार्गदर्शन शिबिरे, ई-केवायसी सुधारणा मोहिमा राबवाव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.दरम्यान, लाडकी बहिण योजना महाराष्ट्र सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे, जी महिलांना आर्थिक सशक्तिकरणासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत, 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!