42 Views
भूअभिलेख विभागात थेट ५० लाख लाचेची मागणी, पैसे न दिल्याने जमिनीचे नुकसान! गुन्हा दाखल, पण आरोपी अजूनही पदावर – कोणाचं अभय आहे?
पुणे, येरवडा – हवेली येथील भू-अभिलेख विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ५० लाख रुपयांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येरवडा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार उपअधीक्षक अमरसिंह रामचंद्र पाटील आणि भुकरमापक किरण येटाळे यांनी एका खासगी व्यावसायिकाकडे मोठ्या रकमेची लाच मागून धमकी दिली.
फिर्यादी कुणाल अष्टेकर यांनी हडपसर येथील त्यांच्या मालकीच्या जमिनीची कायदेशीर मोजणी केली होती. मात्र, जून २०२४ मध्ये हद्द निश्चितीच्या प्रक्रियेत आरोपी अधिकाऱ्यांनी ५० लाखांची मागणी केली. किरण येटाळे याने “सवलत” देत २५ लाखांवर व्यवहार ठरवण्याचा प्रयत्न केला. पैसे न दिल्यास “हेलिकॉप्टर शॉट” लावून जमिनीचे नुकसान करू अशी धमकीही दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
विशेष म्हणजे, आरोपी सरकारी कर्मचारी असूनही त्यांच्यावर अजून कारवाई करण्यात आलेली नाही. “गुन्हा दाखल होऊन आठवडा उलटून गेला तरी पदावरून हटवले गेलेले नाहीत – अभय कोणाचे?” असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.
शहरात अनेक नागरिकांचे असेच अनुभव असून, भ्रष्टाचाराविरोधात ठोस कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे.
गुन्हा भारतीय न्यायसंहितेच्या 308(2), 198, 201 कलमांअंतर्गत आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 च्या कलम 7 अंतर्गत नोंदवण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे सहा. पोलीस आयुक्त मच्छींद्र खाडे करत आहेत.