शिक्रापूरचे हवालदार गजानन खत्री वारंवार गैरहजर, गुन्हे प्रलंबित, वरिष्ठांशी उद्धट वर्तन यामुळे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी केले तात्काळ निलंबित. दररोज दोन वेळा पोलीस मुख्यालयात हजेरी लावण्याचे आदेश.
शिक्रापूर (ता. शिरूर) – कर्तव्यावर सातत्याने अनुपस्थित राहणे, तपासातील गोंधळ, वरिष्ठांप्रती उद्धटपणा आणि शिस्तभंग यामुळे शिक्रापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार गजानन नारायण खत्री यांना अखेर निलंबनाचा फटका बसला आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी ही कारवाई केली असून, संबंधित निलंबनाचे अधिकृत पत्रही गजानन खत्री यांना देण्यात आले आहे.
खत्री यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान हेलिपॅड तसेच तहसील कार्यालयावर बंदोबस्ताचे कर्तव्य टाळले होते. तसेच त्यांच्या ताब्यात दिलेले तब्बल २५ गुन्ह्यांचे तपास आजतागायत प्रलंबित आहेत. एका आकस्मिक मृत्यू प्रकरणात खत्री यांना हत्येची शंका असतानाही त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती न देता गंभीर दुर्लक्ष केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.
फक्त कर्तव्यचुकारपणा नव्हे, तर वरिष्ठांनी चौकशीसाठी बोलावल्यावर उद्धटपणे वागल्याचे देखील स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंग, बेजबाबदारपणा आणि गैरवर्तनाच्या आरोपांवरून शासकीय सेवेतून तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
निलंबनानंतर गजानन खत्री यांना पोलीस मुख्यालयातील राखीव निरीक्षकांकडे दररोज दोन वेळा हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आले असून, यापुढे एका कनिष्ठ अधिकाऱ्यावर देखील कारवाई होण्याची शक्यता आहे.
ही कारवाई पोलीस दलातील जबाबदारी आणि शिस्तीच्या दृष्टीने एक धडा देणारी ठरली आहे.
खत्री हे केवळ एक उदाहरण असून, शिरूर, रांजणगाव आणि शिक्रापूर पोलीस ठाण्यांतील काही कर्मचारी वेळोवेळी कर्तव्यात कसूर करत असल्याचे सातत्याने निदर्शनास येत आहे. काही पोलीस कर्मचारी स्थानिक अवैध धंदे करणाऱ्यांशी आर्थिक हितसंबंध ठेवत असल्याचेही स्पष्टपणे दिसून येत आहे. ही परिस्थिती पोलीस खात्याच्या शिस्त आणि विश्वासार्हतेवर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित करते. अशा प्रकारांवर पुणे पोलीस अधीक्षकांनी तातडीने लक्ष देऊन कठोर कारवाई करणे ही काळाची गरज बनली आहे.