काश्मीरमधील अतिरेकी हल्ल्यात २६ हिंदू पर्यटकांच्या निर्घृण हत्येचा वाघोलीत तीव्र निषेध! भाजपा हवेली तालुक्याच्या वतीने श्रद्धांजली सभा घेत केंद्र सरकारकडे कठोर कारवाईची मागणी. “
काश्मीरच्या पहलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड आणि अमानवी हल्ल्यात २६ निरपराध हिंदू पर्यटकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना देशभरात संतापाची लाट उसळवणारी ठरली आहे. या घटनेचा तीव्र निषेध करत वाघोली येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली. भारतीय जनता पार्टी, हवेली तालुका यांच्या वतीने झालेल्या या सभेत शहीद पर्यटकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उपस्थित कार्यकर्त्यांनी या क्रूर हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करत केंद्र सरकारने अतिरेक्यांविरुद्ध कठोर आणि निर्णायक कारवाई करण्याची मागणी केली. काश्मीरमधील ढासळलेली सुरक्षा व्यवस्था, निष्क्रीय स्थानिक प्रशासन आणि सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांमुळे सामान्य नागरिकांचे प्राण धोक्यात येत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. “हल्लेखोरांना रोखण्यासाठी केंद्राने आता निर्णायक आणि कठोर पावले उचललीच पाहिजेत, अन्यथा अशा घटना पुन्हा घडू शकतात,” असा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला. या वेळी भाजपा हवेली तालुका अध्यक्ष विजय जाचक, जिल्हा सचिव प्रदीप सातव, सुरेश जगताप ,कड मामा, गणेश जाधव, महिला मोर्चाच्या विद्या पाटील, योगिता सातव यांच्यासह विविध महिला पदाधिकारी, युवक कार्यकर्ते आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून शहीद पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण केली. या सभेमुळे वाघोली परिसरात राष्ट्रप्रेम आणि एकजुटीचे वातावरण पाहायला मिळाले.