गड किल्ले संवर्धन संस्था, महाराष्ट्र राज्य, ने २० एप्रिल २०२५ रोजी रविवार दिवशी शौर्य व एकनिष्ठेचे प्रतीक असलेल्या किल्ले सिंहगडावर ९ व्या वर्धापन दिनाचा सोहळा आयोजित केला. या कार्यक्रमाला संस्थेचे २० दुर्ग सौनिक व दुर्गसेविका उपस्थित होते.
संस्था १० वर्षांच्या पदार्पणासह, पुणे, मुंबई, कोकण व सिंहगड युवक-युवती विभागांद्वारे महाराष्ट्रातील विविध किल्ल्यांवर साफसफाई आणि गड स्वच्छतेचे काम करते. यासोबतच संस्थेने अनेक समाज उपयोगी कार्ये देखील केली आहेत.सकाळी ८ वाजता कार्यक्रमाची सुरवात गडावरील श्री अमृतेश्वर मंदिर, श्री कोंढाणेश्वर मंदिर, श्री मारूती मंदिर आणि श्री गणेश मंदिर यांची पूजा करून करण्यात आली. त्यानंतर नरवीर सुभेदार तानाजी मालूसरे यांच्या स्मारकास झेंडूच्या फुलांची सजावट केली.त्याचबरोबर, हिंदवी स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांच्या समाधीचे पुजन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस हार घालून दीप प्रज्वलन करण्यात आले. सिंहगडाचे हिंदवी स्वराज्यात महत्त्व समजून संस्थेने या किल्ल्याच्या शौर्य व स्वामीनिष्ठेची प्रेरणा घेतली.
कार्यक्रमाची सांगता शिववंदना घेऊन करण्यात आली आणि नंतर गडावर येणाऱ्या पर्यटकांसाठी थंडगार कोकण सरबताचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमात वनरक्षक समितीचे नितीन आण्णा गोळे, शिवव्याख्याते श्री ओमकार यादव, पुरातत्व विभागाचे श्रीकांत लांघे, वर्क फॉर कंम्पाशन फाउंडेशन यांच्या टीमसह प्रमुख मान्यवर उपस्थित होते. याचे आयोजन सिंहगड विभाग प्रमुख श्री शांताराम लांघे, संपर्क प्रमुख श्री विजय साळेकर, आणि उत्सव प्रमुख श्री दत्ता जोरकर यांनी केले.
कार्यक्रमाला वनविभाग, पुरातत्व विभाग तसेच स्थानिक ग्रामस्थांचे सक्रिय सहकार्य लाभले.