Home » ताज्या बातम्या » शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अन्यायकारक निर्णयाविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत; मा. नाथाभाऊ पाचर्णे यांचा प्रशासनाला इशारा

शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अन्यायकारक निर्णयाविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत; मा. नाथाभाऊ पाचर्णे यांचा प्रशासनाला इशारा

Facebook
Twitter
WhatsApp
179 Views

शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अन्यायकारक निर्णयाविरोधात शेतकरी संतप्त; बाजार वेळ पूर्ववत न केल्यास ७ मेपासून धरणे आंदोलन आणि रस्त्यावर शेतकरी बाजार भरविण्याचा दिला इशारा.

शिरूर – शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांच्या विरोधात घेतलेल्या निर्णयामुळे असंतोषाची लाट उसळली आहे. शिरूर, पारनेर आणि श्रीगोंदा तालुक्यांतील शेतकऱ्यांसाठी संध्याकाळी ५ ते ८ या वेळेत बाजार भरणे सोयीचे असताना, काही धनदांडग्या व्यापाऱ्यांच्या हितासाठी बाजारपेठेची वेळ अचानक पहाटे ४ वाजता करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना मध्यरात्री घर सोडावे लागत असून चोरी, बिबट्यांचा हल्ला आणि रस्त्यावरील अपघात यासारख्या संकटांचा सामना करावा लागत आहे. पहाटेच्या बाजारात भाजीपाल्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही, परिणामी शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकण्याच्या मार्गावर आहेत.
बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. शेतमाल विक्रीसाठी छप्पर नाही, शिल्लक मालासाठी कोल्ड स्टोरेजची सोय नाही, तसेच वाहतूक व्यवस्थेचा पूर्ण अभाव आहे. व्यापाऱ्यांकडून अल्पदराने माल खरेदी करून ग्राहकांना उच्च दराने विक्री होत असल्याने सामान्य ग्राहकांनाही आर्थिक फटका बसत आहे.
शेतकऱ्यांनी बाजाराची वेळ तातडीने संध्याकाळी ५ ते ८ या पूर्ववत वेळेवर आणावी, बाजार आवारात आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, शेतमाल वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करावी, कोल्ड स्टोरेज व सुरक्षा रक्षकांची व्यवस्था करावी, अनधिकृत शेड व ओटे हटवून शेतकऱ्यांना मोकळी जागा उपलब्ध करून द्यावी, तसेच बाहेरील व्यापाऱ्यांवर नियंत्रण ठेवावे, अशी प्रमुख मागणी केली आहे.
यासाठी दिनांक २८ एप्रिल रोजी शेतकऱ्यांनी शिरूर तहसीलदार कार्यालय, सहकार विभाग व शिरूर पोलिस स्टेशन यांच्याकडे निवेदन दिले आहे. मागण्या मान्य न झाल्यास दिनांक ७ मे रोजी सकाळी १० वाजल्यापासून बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन छेडले जाईल आणि सायंकाळी ५ वाजता रस्त्यावरच शेतकरी बाजार भरविण्यात येईल, असा इशारा शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष नाथाभाऊ पाचर्णे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!