वाघोली-लोहगाव रोडचे एकेरीकरण करण्याच्या प्रशासनाच्या निर्णयावर वाघोली गावातील नागरिकांनी केली तीव्र नाराजी व्यक्त. स्थानिकांचा आरोप आहे की, प्रशासनाने त्यांची भूमिका न ऐकता हट्टी निर्णय घेतला. स्थानिकांनी दिला आंदोलन करण्याचा इशारा ….
पुणे – वाघोली-लोहगाव गावठाणातून जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे एकेरीकरण करण्याच्या प्रस्तावामुळे संपूर्ण वाघोली गावात संतापाची लाट उसळली असून, या एकतर्फी निर्णयामुळे स्थानिकांचा उद्रेक झाला आहे. या निर्णयाचा तीव्र विरोध करत युवासेना हवेली तालुका प्रमुख विक्रम वाघमारे ,रमाई महिला मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष लक्ष्मीताई वाघमारे, अष्टविनायक मित्र मंडळाचे पंकज काळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अप्पर आयुक्त मनोज पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. तात्काळ उचित कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा यावेळी शिष्टमंडळाने दिला
वाघोली-लोहगाव मार्ग हा गावातील एकमेव आणि मुख्य जीवनवाहिनी आहे. या रस्त्यालगत ५००ते ६०० हून अधिक व्यावसायिक दुकाने असून, त्यावर तब्बल २५ हजारांहून अधिक कष्टकरी कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. रस्ता एकेरी झाल्यास या सर्वांचे अर्थचक्रच कोलमडणार आहे. इतकेच नव्हे तर शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, स्मशानभूमी, बाजारपेठ यांना जोडणारा हा एकच मार्ग असल्याने नागरिकांच्या दैनंदिन हालचालींवर मोठा परिणाम होणार आहे. रुग्णवाहिकांची वाहतूक ठप्प होणार, विद्यार्थ्यांना मुख्य नगर रस्त्याच्या धोकादायक गर्दीतून प्रवास करावा लागणार, अशा परिस्थितीत प्रशासनाचा निर्णय अतिशय बेजबाबदार असल्याची संतप्त भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
प्रशासनाने कोणतीही समुपदेशन बैठक न घेता, स्थानिकांची भूमिका न ऐकता, सरळ रस्ताच बंद करण्याचा मार्ग स्वीकारल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर आहे. अनेकांनी हा निर्णय मागे घेतला नाही, तर मोठ्या प्रमाणावर रास्तारोको, धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही दिला. केवळ वाहतूक सुलभ होण्याच्या नावाखाली स्थानिकांच्या रोजीरोटीवर, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर, रुग्णसेवेवर गदा आणणारा निर्णय म्हणजे ‘प्रशासनाचा हट्ट आणि जनतेचा अपमान’ असल्याचा आरोप विक्रम वाघमारे यांनी केला.
त्यामुळे आता प्रशासन काय निर्णय घेत हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे