Home » ब्लॉग » “वर ‘हात’ असल्यावर ताडपत्रीची गरजच काय”अनधिकृत माती वाहतूक – शिरूरचं उघडं सत्य!”?”

“वर ‘हात’ असल्यावर ताडपत्रीची गरजच काय”अनधिकृत माती वाहतूक – शिरूरचं उघडं सत्य!”?”

Facebook
Twitter
WhatsApp
298 Views
शिरूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये सध्या “मातीचा आणि मुरुमाचा सोनं” उपसला जातोय. पण हे सोनं शेतकऱ्याच्या हातात नाही, तर डंपरच्या ट्रिपमध्ये दिसतंय. जेसीबी चालते, माती आणि मुरुम उकरले जातात, डंपरमध्ये भरले जातात आणि वाहतूक सुरू होते — बिनधास्त, बेधडक, कायद्याच्या पायावर तुडवत!
कायद्याचं काय?
त्या गाड्यांवर ताडपत्री नाही, सुरक्षेचं साधन नाही. पण एक गोष्ट मात्र हमखास आहे — “वरचा हात आहे.”
गाडीचालक म्हणतो — “परवाना आहे सर, … साहेबांनी ‘बोलून ठेवलंय!’ RTO आपल्याच माणसातलाय. पोलीस? ते फक्त रस्त्यांवर हजेरी लावतात.”
जनतेच्या मनात स्फोटक प्रश्न –
– ही माती आणि मुरुम कोणत्या हक्काने उचलले जातात?
– महसूल खातं गप्प का?
– प्रत्येक गाडीचा कर कुठे जातो?
– सरकारच्या तिजोरीत, की “खुर्चीखाली गुपचूप”?
या माती-मुरुमचा उगम वैध आहे का?
ज्या वीटभट्ट्यांवर ही माती टाकली जाते, त्यांना परवाना आहे का? जे रस्त्यांवर मुरुम टाकतात, ते कंत्राटदार आहेत का? की ही सगळी ‘विनाकागदपत्र वसुली’ची खास परंपरा?
सिस्टम’ची मिळवाठ स्पष्टपणे दिसतेय!
डंपर बायपासवरून सर्रास जातो. पोलिसांच्या गाडीसमोरून.
RTO चेक पोस्टवरून थेट.
कोणताही अडथळा नाही, कोणतीही कारवाई नाही.
याला म्हणतात – ‘प्रशासन हातात आहे’.
शेतकऱ्यांचा रस्त्यावर प्राण गुदमरतो
या गाड्यांनी रस्त्यांची चाळण केली आहे. धूळ उडते, मुरुमाच्या कणांनी हवा प्रदूषित झाली आहे. अपघात होतात, रस्त्याच्या कडेला चालणं कठीण झालंय. शाळा कॉलेजची मुलं, शेतकरी, रुग्णवाहिका – सगळे या माती-मुरुम साम्राज्याखाली दबले गेले आहेत.
प्रश्न विचारणाऱ्यांना उत्तरं नाही, पण दम भरायला वेळ आहे!
प्रश्न केला की म्हणतात, “आपल्या वरच्यांकडे बोला.”
पण हे “वरचे” नेमकं कोण?
प्रशासन, राजकारणी की माफिया?
पूर्वी वाळू माफिया… आता माती-मुरुम माफिया!
शिरूरमध्ये जेव्हा वाळू उपसा सुरू होता, तेव्हा पोलीस ‘तीन दिवसात कारवाई’ म्हणत होते.
आता त्याच गाड्या माती आणि मुरुमाने भरल्या आहेत — आणि पोलिसही शांत!
कदाचित, नाव बदललंय, खेळ तोच आहे.
“… साहेब, तुम्ही बघताय की मुद्दामच डोळे मिटलेत?”
प्रश्न फक्त प्रशासनाचा नाही, हा लोकशाहीवरचा अविश्वास आहे.
जनतेला आता मातीचे आणि मुरुमाचे डोंगर नाहीत, तर मौनाचे डोंगर जड झालेत.
शेवट नाही… कारण ही कथा चालूच आहे!
हा माती-मुरुमचा प्रवास थांबणार कधी?
कोण थांबवणार?
की, अजूनही ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ सुरूच राहणार?
क्रमशः…

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!