शिरूर तालुक्यात उसाची चोरी; शेतकरी महिला ज्योती जाधव यांच्या शेतातील ऊस चोरून नेल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल.
शिरूर (पुणे) :निमोणे (ता. शिरूर) येथील एका शेतजमिनीवरून सुरु असलेल्या वादातून २० महिन्यांचा ऊस बेकायदेशीररित्या तोडून चोरी केल्याचा आरोप करत विश्रांतवाडी (पुणे) येथील शेतकरी महिला ज्योती शिवाजी जाधव (वय ४२) यांनी तिघांविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
या प्रकरणी महादेव भगवान लाड, आरूणा नाना काळे व नाना सोनबा काळे (सर्व रा. निमोणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दि. १९ मे २०२५ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी जाधव या विश्रांतवाडीहून निमोणे येथे त्यांच्या मालकीच्या गट नंबर 1064/1/अ या शेतजमिनीची पाहणी करण्यासाठी आल्या. त्यावेळी त्यांनी पाहिले की, एक एकर क्षेत्रातील ऊस पूर्णपणे तोडलेला होता व जमिनीची नांगरट केलेली होती.
याबाबत फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, महादेव लाड यांच्याशी सुरु असलेल्या शेतजमिनीच्या वादाचा फायदा घेत आरूणा व नाना काळे यांनी लाड यांना पिक तोडण्यासाठी मदत केली. एकूणच तिघांनी संगनमत करून फिर्यादीच्या मालकीच्या जमिनीवर बेकायदेशीर प्रवेश केला व ऊस चोरी करून नेला, असा आरोप आहे.या प्रकरणाचा तपास पो.हवा टेंगले करत आहेत.