वाघोली : पुणे-अहिल्यानगर महामार्गावर सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण झाले असून, शिरूर ते वाघोली दरम्यान उड्डाणपूल उभारण्याच्या मागणीला आता केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. सड़क परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाचे तांत्रिक सल्लागार बाळासाहेब ठेंग यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (MSIDC) व्यवस्थापकीय संचालक श्री. दीक्षित यांना पत्र पाठवून प्रकल्पाच्या प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश दिले आहेत.
वाहतूक कोंडी व अपघातांमुळे होणारा त्रास लक्षात घेता, भाजपा हवेली तालुकाध्यक्ष विजय जाचक यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत लेखी निवेदन सादर केले होते. या निवेदनाची तत्काळ दखल घेत केंद्र सरकारने संबंधित यंत्रणांना कारवाईसाठी सूचना दिल्या आहेत. सदर प्रकल्पाची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (NHAI) MSIDC कडे हस्तांतरित करण्यात आली आहे. त्यामुळे प्रकल्पास प्रत्यक्ष गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पुणे-अहिल्यानगर महामार्गावर दररोज हजारो वाहने धावत असून, अपघातांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. या ठिकाणी उड्डाणपूल झाल्यास वाहतुकीचा प्रश्न सुटणार असून, नागरिकांना वेळेची बचत व सुरक्षित प्रवास करता येणार आहे. वाघोली, लोणीकंद, शिक्रापूर, पेरणे, कोरेगाव, रांजणगाव आदी भागांतील नागरिकांना याचा थेट लाभ होणार आहे.
हा प्रकल्प केवळ वाहतूक सुलभ करण्यासाठी नव्हे, तर या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. केंद्र सरकारच्या तात्काळ हस्तक्षेपामुळे आणि प्रशासनाच्या पुढाकारामुळे स्थानिक नागरिकांत समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.