🔹 वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तपासाचा स्पष्ट खुलासा का मागवला जात नाही?
🔹 काय वाघोली शाखेत झालेल्या कामांची सखोल चौकशी कुणालाही नको आहे का?
🔹 चुकीचं करताना सोयीनं ‘अज्ञात’, आणि नंतर ‘सापडला’ म्हणत मोकळं होणं – हा कोणाचा कारस्थानात्मक खेळ आहे?
🔹 वरिष्ठ अधिकारीच आपले माजी सहकारी वा कनिष्ठ अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहेत का?
ट्रान्सफॉर्मर गायब… मग तो सापडतो… मात्र आरोपी कोण? आजवर ठोस कारवाई काहीच नाही. आणि यावरून एकच प्रश्न – वाघोली महावितरण कार्यालयातील ‘गायब ट्रान्सफॉर्मर’ प्रकरणात वीज चोरी, अपारदर्शक कामकाज आणि संभाव्य भ्रष्टाचाराची छाया अधिकच गडद होत आहे. पण या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरही महावितरणचे वरिष्ठ अधिकारी थंड प्रतिक्रिया देत आहेत.
२०१९ मध्ये बसवलेला, २०२० पासून निष्क्रिय असलेला आणि एप्रिल २०२५ मध्ये अचानक “गायब” झालेला गेरा वर्ल्ड ऑफ जॉय प्रकल्पातील ट्रान्सफॉर्मर नुकताच सापडला. मात्र, यासाठी ना कोणती नोंद होती, ना कोणती फाईल – हे स्पष्ट झाले आहे की, यामागे व्यवस्थेतीलच कोणीतरी संमतीने वा दुर्लक्षाने भूमिका बजावली आहे. तरीही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या संदर्भात कोणताही ठोस खुलासा, ना तपासासाठी समिती नेमण्याचा निर्णय!
प्रश्न पडतोय – ‘वरिष्ठच’ पाठीशी घालत आहेत का?
या प्रकारात महावितरणच्या तात्कालीन कर्मचाऱ्यांची संलग्नता असण्याचा संशय आहे. ट्रान्सफॉर्मर हलवण्यासाठी लाईन बंद करावी लागते, त्यासाठी शाखा व उपविभागीय स्तरावर अधिकृत परवानगी लागते. अशा परिस्थितीत परवानगीशिवाय ट्रान्सफॉर्मर हलवला गेला, म्हणजे व्यवस्थेतील कोणी तरी ‘डोळेझाक’ केली हे स्पष्ट आहे.
पण आश्चर्य म्हणजे, या प्रकाराची सखोल चौकशी करण्यासाठी वरिष्ठांकडून समिती नेमण्याची साधी घोषणा देखील करण्यात आलेली नाही. हे पाहता एकच सवाल उपस्थित होतो – महावितरणचे वरिष्ठच या अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहेत का? की हे सगळे एका ‘संरक्षित यंत्रणेचा’ भाग आहे?
दोषींवर कारवाई हवी!
‘अज्ञात आरोपी’ असा कायदेशीर पळवाट मार्ग स्वीकारून खरे दोषी मोकाटच राहणार का, असा रोष सध्या नागरिकांमध्ये पाहायला मिळतो आहे. स्थानिक नागरिक, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते सतत या प्रकरणात पारदर्शक चौकशीची मागणी करत आहेत. “फक्त बातम्यांचा इम्पॅक्ट करून उपयोग नाही; दोषींवर गुन्हे दाखल करून कारवाई झाली पाहिजे!” अशी जनतेची एकमुखी मागणी आहे.
महावितरणसारखी महत्वाची संस्था जर आपल्या शाखा कार्यालयातील गैरव्यवहारांवर डोळेझाक करत असेल, तर मग शिस्त, पारदर्शकता आणि जबाबदारी हे शब्द केवळ कागदावरच राहणार का?
या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खुलासा दिला नाही तर प्रश्न वाढतच जाणार… आणि जनतेचा ‘करंट’ पुन्हा सरकारला जाणवणार!
ट्रान्सफॉर्मरच्या एका घटनांमुळे वाघोली महावितरण कार्यालयात मागील काळात काय-काय घडले याचा अंदाज येतो. पण जर वरिष्ठच चौकशीसाठी तयार नसतील, तर हा प्रकार व्यवस्थेच्या ‘उजेडात’ न आणण्यासाठीचा अंधारच म्हणावा लागेल.
शेवटी ट्रान्सफॉर्मर मिळाला, पण “जवाबदार कोण?” याचा शोध घेण्यासाठी लोकांचा करंट आता अधिकच तापणार आहे!
याबाबत महावितरण पुणे मंडळचे मुख्य अभियंता सुनील काकडे यांच्याशी संपर्क साधला असता चौकशीचे आदेश दिल्याचे सांगितले , परंतु नुसते चौकशीचे आदेश न देता चौकशीचे लेखी आदेश देणे गरजेचे आहे