काम सुरू होणार हे समजताच अनिल मिश्रा यांनी उपोषणाच्या नावाने स्टंटबाजी केली, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत स्थानिकांनी स्पष्ट केलं – “हे आमच्या प्रयत्नांचं फळ, नाही कुणाच्या एक दिवसाच्या नाटकाचं!”
आयव्ही इस्टेट रस्त्यावरील ड्रेनेज लाईनच्या समस्येवर प्रशासनाने अखेर काम सुरू केले असले तरी, या कामाच्या पार्श्वभूमीवर उपोषणाच्या नावाखाली स्वतःची प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी अनिल मिश्रा यांच्यावर केला आहे. “हे आंदोलन नव्हे, केवळ स्टंटबाजी आहे,” अशा तीव्र शब्दांत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून या भागात रस्त्यावर साचलेल्या सांडपाण्यामुळे नागरिकांचे हाल सुरू होते. या प्रश्नावर स्थानिक शेतकरी, सोसायट्यांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात सातत्याने चर्चा सुरू होत्या. मात्र, या दरम्यान अनिल मिश्रा यांनी अचानक उपोषण सुरू केले आणि माध्यमांमध्ये प्रसिद्धी मिळवताच स्थानिकांत अस्वस्थता निर्माण झाली.
“मिश्रा यांनी काम सुरू होणार असल्याचे समजूनच उपोषणाचा नाटक केला!” – सचिन माळी
“आम्ही एक महिन्यापासून स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्याशी संवाद साधून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत होतो. मिश्रा यांना काम सुरू होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतरच त्यांनी उपोषणाच्या नावाखाली स्टंटबाजी केली. आमच्या रस्त्याचा प्रश्न आम्ही सोडवणार. त्यांनी आधी त्यांच्या सोसायटीतील समस्या सोडवाव्यात!” अशी परखड टीका आयव्ही फेडरेशनचे अध्यक्ष सचिन माळी यांनी केली.
“प्रश्न एक दिवसाचा नव्हता, पाठपुरावा आमचा होता” – जमुना सांगळे
“या भागात १० ते १२ सोसायट्यांना सांडपाण्याच्या समस्येचा सामना करावा लागत होता. यावर स्थानिक लोकप्रतिनिधी, शेतकरी आणि नागरिकांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. एक दिवस उपोषण करून होल्डिंग लावून श्रेय घेण्याचा प्रयत्न म्हणजे जनतेची दिशाभूल आहे,” अशी प्रतिक्रिया स्थानिक रहिवाशी जमुना सांगळे यांनी दिली.
“हे उपोषण कामासाठी होते की अडथळ्यासाठी?” – शरद चौघुले
“ड्रेनेजचे काम सुरू होणार हे माहिती असल्यावरच उपोषण करण्यात आले. जर त्यांना खरंच समस्या होती, तर गेल्या वर्षी किंवा महिनाभरापूर्वी आंदोलन केले असते. त्यामुळे हे आंदोलन काम सुरू होण्यासाठी होते की थांबवण्यासाठी, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे,” असा गंभीर सवाल सोसायटी रहिवासी शरद चौघुले यांनी उपस्थित केला.
प्रशासनाने ड्रेनेज लाईनचे काम सुरू केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी या कामाच्या श्रेयावरून सुरू झालेल्या वादाने परिसरात नवा वादंग निर्माण केला आहे. लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि स्थानिकांनी एकत्रितपणे समस्या सोडवण्याचे प्रयत्न सुरू असतानाही उपोषणाच्या नावाखाली एकतर्फी स्टंटबाजी करणे योग्य की अयोग्य – यावर आता नागरिक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
2 Comments
अनिल मिश्रा चे काम चांगले आहे.
फुल support . Next नगरसेवक fix..
.