आशिया चषकावेळी सतत विष ओकणाऱ्या पोस्ट; भारताने फायनल जिंकताच ट्रॉफी घेऊन पळालेला पाकिस्तानचा मंत्री आहे तरी कोण?
आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर (India beat Pakistan Asia Cup 2025) शानदार विजय मिळवल्यानंतर ट्रॉफी वितरण समारंभात असे काही घडले, जे क्रिकेटच्या इतिहासात कदाचित यापूर्वी कधी झाले नसेल.
दुबई येथे रविवारी झालेल्या सामन्यानंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि त्यांचे सहकारी खेळाडूंनी आशियाई क्रिकेट परिषद (ACC) चे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर नक्वी यांनी ती ट्रॉफी स्वतःसोबत नेली. भारतीय संघाने मग ट्रॉफी न उचलताच जल्लोष साजरा केला.
नक्वी यांच्या या कृतीने फक्त क्रिकेट विश्वातच नव्हे, तर राजकीय वर्तुळातही खळबळ उडवली. बीसीसीआयने जाहीर केले आहे की येत्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या आयसीसी बैठकीत ते नक्वी यांच्या या वागणुकीविरोधात निषेध नोंदवणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, सामन्यानंतर भारतीय खेळाडूंना सांगण्यात आले की पाकिस्तानचे गृहमंत्री व पीसीबीचे प्रमुख मोहसीन नक्वी यांच्याकडून त्यांना ट्रॉफी दिली जाईल. त्यावर भारतीय संघाने स्पष्ट नकार दिला. खेळाडूंचे म्हणणे होते की, ते ट्रॉफी इतर कोणत्याही अधिकाऱ्याकडून स्वीकारतील, पण नक्वींकडून नाही, कारण ते नेहमीच भारतविरोधी विधानं करत आले आहेत.