महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नंतर बळजबरीनं धर्मांतर करून लग्न
पुरोगामी महाराष्ट्र अशी ज्या राज्याची ओळख करून दिली जाते, त्याच महाराष्ट्रात महिला सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर असून दिवसागणिक ही परिस्थिती आणखी वाईटच होत चालली आहे.
नुकत्याच घडलेल्या एका घटनेमुळं पुन्हा एकदा महाराष्ट्रात कायद्याची भीती कोणाला राहिली आहे की नाही, हाच प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अल्पवयीन मुलीवर आधी अत्याचार, नंतर…
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून त्यानंतर बळजबरीनं धर्मांतर करून लग्न केल्याची धक्कादायक घटना सोलापूर शहरात घडली असून इथं वकिलासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापुरातल्या विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला असून, त्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.
इजराईल शेख, उजेब शेख, ऍड. अब्दुल्ला खतीब असं अटक केलेल्या आरोपींचं नाव असून इतर दोन आरोपी अद्याप फरार आहेत अशी माहिती आहे. आरोपी इजराईल शेख हा पीडित अल्पवयीन मुलीचा सतत पाठलाग करत होता. डिसेंबर 2024 मध्ये त्याने पीडितेचे फोटो आणि विडिओ मिळवत तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. त्यानंतर मित्र उजेब शेख याच्या घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केले. डिसेंबर 2025 मध्ये पीडित मुलीला आरोपी इजराईलनं लग्नाचं आमिष दाखवत तिला शहर काझी कार्यालयात नेलं.
काझी कार्यालयात अॅड. अब्दुल्ला खतीबनं लग्नासाठी धर्मांतर गरजेचं असल्याचं सांगत काही कागदपत्रांवर तिची सही घेतली. जबरदस्तीने धर्मांतर करत तिचं लग्न लावत या मुलीशी लग्न लावण्यात आलं आणि यानंतर तिला काही महिने कर्नाटकातील कलबुर्गी इथं ठेवण्यात आलं. त्या ठिकाणी आरोपीचे आतेभाऊ आणि त्याच्या आईनं पीडितेला मारहाण केली, उपाशी ठेवून छळ केला. खुद्द पीडितेनंच आपल्या तक्रारीत घडला प्रकार सांगितल्याची माहिती आहे. तिच्या तक्रारीनंतर सोलापुरातील विजापूर रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील तिघांना अटक करण्यात आली आहे.






