अजित पवारांच्या शिलेदाराने भाजपाचा गड भेदला! २५ वर्षांच्या सत्तेला लावला सुरूंग
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) आमदार सुनील शेळके यांनी भाजपाला झटका दिला. निवडणुकीचा प्रचार सुरू असतानाच अजित पवारांचे निधन झाले आणि पक्षाला मोठा धक्का बसला.
या दुःखातून सावरत आमदार सुनील शेळके यांनी मावळात २५ वर्षांपासून असलेल्या भाजपाच्या सत्तेला सुरूंग लावला.
मावळ पंचायत समितीमध्ये मागील २५ वर्षांपासून भाजपाची सत्ता आहे. सुनील शेळके यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) पंचायत समिती निवडणुकीमध्ये चांगली कामगिरी केली आहे.
मावळ पंचायत समितीच्या दहा जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) विजय मिळवला आहे. त्याचबरोबर या भागातील जिल्हा परिषदेच्या पाच जागाही जिंकल्या आहेत. त्यामुळे भाजपाचा तालुक्यातील प्रभावालाच हा हादरा असल्याचे मानले जात आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार पहिल्या टप्प्यात असतानाच अजित पवारांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रचार केला गेला नाही. स्थानिक पातळीवरच प्रचारावर लक्ष दिले गेले. अशातही आमदार सुनील शेळकेंच्या नेतृत्वाखाली पक्षाने चांगली कामगिरी केली आहे.
या निवडणुकीच्या निमित्ताने बाळा भेगडे आणि आमदार सुनील शेळके यांच्यातच लढत होती. मावळ तालुक्यातील पाच गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) उमेदवार विजयी झाले. त्याचबरोबर पंचायत समितीमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसने निर्विवाद सत्ता मिळवत ताकद सिद्ध केली आहे.






