कर्जतमध्ये महायुतीचे पानिपत; खालापुरात ‘राम-लक्ष्मण’ जोडीने शिवसेना तारली
खालापुरात थोरवेंची प्रतिष्ठा धुळीला
नरेश पाटील आणि भाई शिंदेंच्या करिष्म्याने भगवा वाचला
कर्जत-खालापूरमध्ये महायुतीला धक्का
Raigad Zilla Parishad: नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत कर्जत-खालापूर मतदार संघात पानिपत झालेले पहावयास मिळाले, कर्जतमध्ये कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी प्रतिषठेची बनवलेल्या या निवडणुकीत त्यांची प्रतिष्ठा धुळीला मिळाली असून खालापुरात नरेश पाटील व भाई शिंदे यांनी करिष्मा केला नसता तर खालापुरातही पानिपत झाले असते.
कर्जत खालापूर मतदार संघात कर्जत तालुक्यात सहा व खालापुरात चार जागा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी कर्जत तालुक्यात बारा व खालापुरात आठ जागासाठी मतदान झाले. शिवसेना भाजप आरपीआय अश्या महायुतीत लढणाऱ्या शिवसेना पक्षाला या निवडणुकीत राष्ट्रवादी व शिवसेना उबाठा पक्षाच्या परिवर्तन विकास आघाडीने अक्षरशः धूळ चारली.
कर्जतच्या सहाच्या सहा जागा परिवर्तन विकास आघाडीने जिंकत व पंचायत समितीच्या बारा पैकी दहा जागा जिंकत शिवसेना महायुतीचे अक्षरशः पानिपत केले. कर्जत खालापूर मतदार संघात शिवसेना महायुतीचे महेंद्र थोरवे हे आमदार आहेत. ही निवडणूक त्यांनी प्रतिष्ठेची बनवली होती. खालापूरमध्ये आत्करगाव जिल्हापरिषद ही जागा व खानाव ही पंचायत समितीची जागा शिवसेनेने जिंकल्यामुळे खालापुरात शिवसेना पानिपत होण्यापासुन तरली आहे.
आल्करगाव जिल्हा परिषद गटात जिल्हा परिषदेचे माजी सभापती नरेश पाटील व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भाई शिंदे या रामलक्ष्मणाच्या जोडीने जिल्हा परिषद व पंचायत समितीची एक जागा जिंकत शिवसेनेला तारले आहे, नरेश पाटील यांची सून रेश्मा पाटील व खानाव पंचायत समितीमध्ये स्वतः भाई शिंदे हे निवडणूक लढवत होते. ही राम लक्ष्मणची जोडी एकत्र आहे व भगवा फडकावणारच अशी भीमगर्जना भाई शिंदे आणि नरेश पाटील यांनी प्रचार दरम्यान केली होती.
भाई शिंदे आणि नरेश पाटील फार जुने शिवसैनिक व एकदा एकमेकांसमोर जिल्हा परिषदची जागा लढले होते, त्यामुळे आत्करगाव जिल्हा परिषद गटामध्ये एकूण एक मतदारांची त्यांना ओळख होती. दोघांच्या दौन ताकदी एकत्र आल्याने हा विजय त्यांना सोपा झाल्याचे बोलले जात आहे. खालापुरात चार जिल्हापरिषदच्या जागा भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी व शिवसेना उबाटाला मिळाली. त्यामुळे खालापुरात या चारही पक्षाना समसमान यश मिळाले व एक प्रकारे शिवसेना तरली व नाक वाचले.
आमदार शिवसेनेचा असताना त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी व शिवसेना उबाठा यांनी एकत्र येत परिवर्तन विकास आघाडी काढत मोठे आव्हान उभे केले व संपूर्ण कर्जत खालापूर मतदार संघाचा विचार केला तर परिवर्तन विकास आघाडीने आमदार महेंद थोरवे यांना जोरदार धक्का दिला, पण खालापुरात नरेश पाटील व भाई शिंदे यांनी विजय खेचून आणित शिवसेनेला तारले असल्याने भाई शिंदे व नरेश पाटील यांच्या रामलक्ष्मणच्या जोडीमुळे शिवसेना तरली असे बोलले जात आहे.






