वाघोली-लोणिकंद परिसर धुळीच्या विळख्यात!
डंपर, खाणी, क्रशर माफियांमुळे प्रदूषणाचा कहर – श्वसनाचे त्रास, अपघात, मृत्यू वाढलेत!
प्रशासन गप्प – हप्ता घेत मौन बाळगतंय!
नागरिकांचा सवाल – “आमचं आरोग्य, आमचे प्राण… जबाबदार कोण?”
वाघोली, लोणिकंद, भावडी, पेरणे फाटा, बकोरी,तुळापूर या परिसरात सुरू वाघोली, लोणिकंद, भावडी, पेरणे फाटा, बकोरी, तु शेकडो दगड खाणी आणि क्रशर युनिट्समुळे संपूर्ण परिसर प्रदूषणाच्या मर्यादा ओलांडत चालला आहे. आधी तुरळक वस्ती असलेल्या या भागात आता नागरी वसाहती झपाट्याने वाढल्या असताना, हाच परिसर धूळ आणि धोकादायक वाहतुकीमुळे आज नागरीकांच्या जिवाला घात ठरत आहे.
धूळ आणि सूक्ष्म कणांच्या प्रदूषणामुळे लहान मुले, वृद्ध आणि दम्याचे रुग्ण श्वसनाच्या गंभीर आजारांनी त्रस्त आहेत. अनेकांचे आरोग्य बिघडले असून, परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच चिंताजनक बनत चालली आहे. परंतु, हे सगळं पाहूनही प्रशासन मात्र गप्पच आहे.
दररोज हजारो डंपर विना परवाना विना नियम वाघोली ते पुणे, हडपसर, चंदननगर मार्गावरून खडी, मुरुम, डबर (दगड), वाळू अशा क्रशर मटेरिअलची वाहतूक करत आहेत. हे डंपर अक्षरशः ओव्हरलोड भरले जात असून, त्यातून रस्त्यावर डबर (दगड) सांडत असतो. काही डंपरमध्ये तर सामग्री गाडीच्या बाहेरपर्यंत भरलेली दिसते. परिणामी, रस्त्यांवर अपघातांचे प्रमाण झपाट्याने वाढले असून, अनेकांना आपले प्राण गमवावे लागलेत. काही नागरिक कायमचे अपंग झाले आहेत.
रोजच्या रोज तयार होणारा ‘मृत्यूचा सापळा’ पाहूनही RTO, वाहतूक पोलीस, महसूल विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि आरोग्य विभाग यांच्याकडून कोणतीही ठोस कारवाई होत नाही. कारण स्पष्ट आहे – दर महिन्याला मिळणारा ‘हप्ता’ आणि आर्थिक हितसंबंध. या साऱ्यामुळे प्रशासन खाण माफियांच्या हातात गलेलठ्ठ रक्कमांच्या मोबदल्यात गप्प बसलं आहे, असा गंभीर आरोप नागरिक करत आहेत.
स्थानिकांचा संतप्त सवाल आहे – “जर एखाद्या निष्पापाचा जीव गेला, तर जबाबदार कोण?” प्रशासनाचे हे मौन म्हणजे माफियांना परवाना देणारी सोयीस्कर परवानगीच आहे, अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर, काही स्वार्थी मंडळी आपल्या आर्थिक हितसंबंधांपोटी या प्रश्नांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याची चर्चाही सध्या परिसरात रंगली आहे. लाखो रुपयांची उलाढाल दर महिन्याला या नेटवर्कमधून होते, हे उघड गुपित आता उघडपणे बोललं जाऊ लागलं आहे.
प्रशासन आणि संबंधित विभागांनी आता तरी जागं होऊन कठोर पावलं उचलावीत, अन्यथा लवकरच जनतेचा उद्रेक होईल, असा इशारा संतप्त नागरीक देत आहेत.