रांजणगाव एमआयडीसीमधील MEPL कंपनीच्या प्रदूषणामुळे निमगाव भोगीतील शेतजमिनी नापीक झाल्या असून पाणी विषारी झाले आहे. गावकऱ्यांना गाव सोडायची वेळ आली असून त्यांनी शरद पवार, उदय सामंत यांच्यासमोर आपली व्यथा मांडली.
रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील MEPL (महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड) कंपनीच्या प्रदूषणामुळे त्रस्त झालेल्या निमगाव भोगी येथील ग्रामस्थांनी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासमोर थेट व्यथा मांडत न्यायाची मागणी केली.
“आम्ही नाईलाजास्तव गावात राहत आहोत. पर्याय नाही. मात्र आमच्या पुढच्या पिढ्यांचं आयुष्य उध्वस्त झालं आहे. पाणी विषारी झालंय, जमिनी नापीक झाल्या आहेत. आता गाव सोडायची वेळ आलीय, पण कोणी जमिनीही विकत घेत नाही. एमआयडीसी येऊनही आमच्या वाट्याला ससे होलपटच आलाय.” — अशा भावना ग्रामस्थांनी पवार आणि सामंत यांच्यासमोर व्यक्त केल्या.
या प्रसंगी बोलताना ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले, “शिरूरच्या माळरानावर एमआयडीसी आणली, चासकमान व डिंभा कालव्याचं पाणी आलं, आणि तालुका नंदनवन झाला. मात्र निमगाव भोगीतील प्रदूषणाची बाब गंभीर असून यावर उपाय गरजेचा आहे. उद्योग व पर्यावरण विभाग योग्य निर्णय घेतील. पण या कंपनीला देण्यात येणाऱ्या अतिरिक्त जमिनीचा निर्णय तहकूब करण्यात यावा. शेती व जनावरांचं झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी मंत्रिमंडळात निर्णय व्हावा.”
उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून मंत्रिमंडळाची बैठक बोलावून शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल.”
खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी आमदार अशोक पवार, सूर्यकांत पलांडे, देवदत्त निकम, विकास लवांडे, सरपंच ज्योती लक्ष्मण सांबारे, शेखर पाचुंदकर आदींसह मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रकाश थोरात तर आभार पांडुरंग अण्णा थोरात यांनी मानले.